22 November 2010

कला संघटक ‘संस्कार भारती’


साहित्य, ललित आणि रंगमंचावरील उच्च दर्जाच्या अभिरूचीसपन्न असलेल्या कलांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज संघटित करण्याचे आणि संघटित समाज संस्कारीत करण्याचे काम ‘संस्कार भारती’ करत आहे. ‘संस्कार भारती’ कला क्षेत्रात काम करणारी, कलाकारांचे संघटन करणारी, कौटुंबिक भावना असलेली राष्ट्रव्यापी संघटना आहे. संपूर्ण देशात राज्या-राज्यांत ‘संस्कार भारती’चे संघटनात्मक काम मोठ्या प्रमाणात यशस्वीरीत्या सुरू आहे.

समाजातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, व्यावसायिक, अव्यवसायिक नवोदित कलाकारांना एकत्र आणून, त्या त्या कलाकारांच्या कलेच्या सादरीकरणातून; कलेच्या माध्यमातून समाजमनावर संस्कार घडवण्याचे काम आणि त्यातून थोर मानवी मूल्यांचे संवर्धन करणारा समाज घडवण्याचे काम ‘संस्कार भारती’ करत आहे. ‘संस्कार भारती’ कलांचे शिक्षण देणारी शिक्षण संस्था नाही. तसेच मनो
रंजनाचे कार्यक्रम करून अर्थोत्पादन करणारी संस्थाही नाही. ‘संस्कार भारती’चा मुख्य उद्देश कलेच्या माध्यमातून समाजातील व्यक्ती व्यक्ती संस्कारीत करणे, संस्कारक्षम व्यक्तींचा चारित्र्यसंपन्न समाज घडवणे व त्यातून शक्तिशाली, वैभवसंपन्न राष्ट्र घडवणे.

‘संस्कार भारती’ची स्थापना 11 जानेवारी 1981 रोजी लखनऊ येथे झाली. पद्मश्री डॉ. हरीभाऊ वाकणकर (जगद्विख्यात पुरातत्त्वज्ञ, नाणकशास्त्रज्ञ, पुराभिलेख तज्ज्ञ आणि कला शिक्षक) यांनी संस्थापक महामंत्री म्हणून काम पाहिले. ‘सा कला या विमुक्तये’ हे ‘संस्कार भारती’चे बोधवाक्य आहे आणि तेराव्या शतकात बांधल्या गेलेल्या प्रसिद्ध कोणार्कच्या सूर्यमंदिरातील रथाचे चाक हे बोधचिन्ह आहे. सर्व कलांची देवता म्हणून ज्याला मानतात, तो नटराज ‘संस्कार भारती’चे आराध्य दैवत, तर आद्य नाट्यशास्त्रकार भरतमुनी यांना गुरूस्थानी मानले आहे.

‘संस्कार भारती’चे रांगोळी रेखाटन (भू-अलंकरण) हे मनाला भावणारे, प्रसन्न करणारे सादरीकरण आहे. अनेकांनी एकत्र येऊन योजनापूर्वक रांगोळी काढल्याने एक टीमवर्क उभे राहते. रांगोळीसोबत चित्रकला, साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य या कला विषयांच्या माध्यमातून, समाजातील सर्व वर्गातील लोकांवर लोकशिक्षणाद्वारे निरनिराळ्या ललित कलांच्या माध्यमातून संस्कार करून राष्ट्रीय भावनेची जागृती आणि राष्ट्रीय भावात्मक एकता वाढीस लागते.

या उद्दिष्टपूर्तीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. ते खालीलप्रमाणे :
ा आपल्या समिती क्षेत्रातील व्यावसायिक व नवोदित कलाकारांचा शोध घेऊन त्यांना एका
व्यासपीठावर आणणे. विषयवार सूची तयार करणे.
ा चित्र प्रदर्शन, स्लाईड शो आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
ा व्याख्यानमाला, कीर्तन, भजन, कथाकथनाचे कार्यक्रम घडवून आणणे.
ा लोकशिक्षणार्थ लोककलांची कार्यशाळा आयोजित करणे.
ा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटित करून समाजप्रबोधनासाठी पथनाट्यांचे आयोजन करणे.
ा ज्येष्ठ कलाकारांकडून नवोदित कलाकारांना त्या त्या कलेविषयी मार्गदर्शनपर अभ्यासवर्गांचे आयोजन करणे.
ा कला क्षेत्रातील विस्कळीतपणा, आपपर भाव दूर करून निकोप आनंदाचे साधन म्हणून लोकांनी पाहावे यासाठी प्रयत्न करणे.
ा पारंपारिक आणि आधुनिक कलांचे संशोधन-संवर्धनात्मक अभ्यास करणे व प्रसार करणे.
ा कला सादरीकरणाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर समाजातील सर्व थरातील जाती, पंथ, धर्म भेदभाव दूर ठेवून आपण या समाजाचे घटक आहोत, देशाचे नागरीक आहोत, राष्ट्राचे पायीक आहोत, ही राष्ट्रीय भावना जागृत करणे व देशाची भावात्मक एकता वाढीस लावणे.

गोरेगाव समिती

दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर 1997 या काळात संभाजी नगर येथे ‘संस्कार भारती-महाराष्ट्र प्रांता’चा तृतीय ‘कला साधक संगम’ संपन्न झाला. गोरेगावातील काही कलाकार व रसिक या संगमाला गेले होते. ‘कला साधक संगम’च्या मंचावर अभिरूची संपन्न संगीत, नृत्य, नाट्य, गायन, चित्रकला यांचे सादरीकरण व मुख्य म्हणजे विविध रंगांच्या भव्य रांगोळ्या हे त्या कार्यक्रमाचे आकर्षण होते. हे सर्व पाहून ऐकून गोरेगावातून उपस्थित राहिलेल्या कलाकारांनी आपणही गोरेगावात ‘संस्कार भारती’चे काम सुरू करायचे असे निश्चित केले. भरतमुनी जयंतीच्या दिवशी, 21 फेब्रुवारी 1998 रोजी संवादिनीवादक पंडीत चिमोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजपूजनाने ‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’ची औपचारिक स्थापना झाली.

पांडुरंगवाडी मसुराश्रम येथे 24 मे 1998 रोजी पहिला रांगोळी प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. गोरेगाव समितीने आयोजित केलेल्या या पहिल्या शिबिरात 75 महिला व पाच पुरुष सहभागी झाले. या शिबिरानंतर सन्मित्र मंडळ विद्यामंदिर येथे साप्ताहिक रांगोळी प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू झाले व आजपर्यंत सुरू आहेत. आजपर्यंत या वर्गांतून 1 हजारहून अधिक महिलांनी व पुरुषांनी रांगोळी रेखाटनाची कला आत्मसात केली आहे. या वर्गांमुळे अनेक कार्यकर्ते ‘संस्कार भारती’शी जोडले गेले व त्यांच्या जोरावर समितीने अनेक लहान-मोठे उपक्रम-कार्यक्रम गेल्या काही वर्षांत यशस्वीपणे राबवले आहेत.

‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’ने मोठे कार्यक्रम केले त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे कार्यक्रम म्हणजे, ‘वेद मंत्राहून वंदनीय वंदे मातरम्’ हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ग.दि. माडगुळकररचित संपूर्ण ‘गीतरामायणा’चे सादरीकरण, स्व. सुधीर फडके यांना आदरांजली वाहणारा ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा कार्यक्रम, पु.ल. देशपांडेंच्या ‘वार्‍यावरची वरात’ तसेच ‘नारायण’चे सादरीकरण, रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांची प्रकट मुलाखत, स्वा. सावरकरलिखित ‘1857 चे स्वातंत्र्यसमर’चे नाट्यरूपांतर, ‘स्वरप्रभात पहाट राग’ असे अनेक प्रासंगित, तसेच मासिक कार्यक्रम आहेत. शिवाय रामनवमी, गुरुपौर्णिमा, कृष्ण जन्माष्टमी, दिवाळी परिवार मेळावा, प्रजासत्ताक दिन व भरत मुनी जयंती हे सहा अनिवार्य कार्यक्रम घेतले जातात.


अशा अनेक उपक्रमांतून ‘संस्कार भारती’ समाजमनावर समाजसंघटनेचा संस्कार घडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असते.

- अरविंद जोशी
(लेखक बरेच वर्ष ‘संस्कार भारती-गोरेगाव समिती’चे कार्यवाह होते
व सध्या पश्चिम मुंबई विभागाचे प्रमुख आहेत.)
99691 96626

No comments:

Post a Comment